मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा; पुणे-हैदराबाद प्रवासही होणार अवघ्या 2 तास 8 मिनिटांत
मुंबई | प्रतिनिधी
मुंबई आणि पुणेकरांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. प्रस्तावित मुंबई-पुणे बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे दोन्ही शहरांमधील प्रवासाचा कालावधी अवघ्या 48 मिनिटांपर्यंत कमी होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या प्रकल्पामुळे मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरांचा एकात्मिक आर्थिक क्षेत्र म्हणून विकास होण्यास मोठी मदत मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील जॅबिल कंपनीच्या अत्याधुनिक उत्पादन विस्तार प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी केंद्रीय रेल्वे, माहिती व प्रसारण तसेच इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, महाराष्ट्राला जागतिक पुरवठा साखळीतील महत्त्वाचे केंद्र बनवण्यासाठी जेएनपीटी आणि उभारणीच्या अंतिम टप्प्यात असलेल्या वाढवण बंदराला समृद्धी महामार्गालगत स्वतंत्र मालवाहतूक रेल्वे कॉरिडॉरद्वारे जोडण्याचा महत्त्वाकांक्षी प्रस्ताव केंद्र सरकारसमोर ठेवण्यात आला आहे. हा कॉरिडॉर जालना, वर्धा येथील ड्राय पोर्ट आणि पुढे गडचिरोलीपर्यंत विस्तारला जाणार आहे.
या प्रकल्पामुळे वाहतूक आणि लॉजिस्टिक्स खर्चात 7 ते 8 टक्क्यांची बचत होऊन उद्योगांना मोठा फायदा होईल, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
दरम्यान, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी महाराष्ट्रातील विविध रेल्वे आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांची माहिती देताना मुंबई-पुणे बुलेट ट्रेनमुळे प्रवासाचा कालावधी 48 मिनिटांपर्यंत कमी होणार असल्याचे सांगितले. तसेच पुणे-हैदराबाद प्रवास अवघ्या 2 तास 8 मिनिटांत पूर्ण होईल, असेही त्यांनी नमूद केले.
महाराष्ट्र देशातील प्रमुख डेटा सेंटर हब म्हणून उदयास येत असून भारतातील सुमारे 60 टक्के डेटा सेंटर क्षमता राज्यात विकसित होत असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. डेटा सेंटर, डीप टेक, इलेक्ट्रॉनिक्स आणि सेमीकंडक्टर उत्पादनाशी संबंधित संपूर्ण उद्योग परिसंस्था राज्यात उभारण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.
तज्ज्ञांच्या मते, मुंबई-पुणे बुलेट ट्रेन प्रकल्प साकार झाल्यानंतर राज्यातील उद्योग, व्यापार, गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा प्रकल्प महाराष्ट्राच्या विकासासाठी गेमचेंजर ठरू शकतो.