नवी दिल्ली | प्रतिनिधी
कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी ‘जय भीम’चा नारा देत अमेरिकेतून भारतासाठी रवाना झाल्याची घोषणा केली आहे. दिल्लीतील जंतर-मंतर येथे प्रस्तावित आंदोलनासाठी ते शनिवारी सकाळी भारतात पोहोचणार असल्याचे त्यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे जाहीर केले.
भारतासाठी रवाना होताना अभिजीत दिपके यांनी सोशल मीडियावर भावनिक संदेश शेअर केला. “भारतासाठी निघालो आहे. माझे भविष्य मी संविधानाच्या हाती सोपवत आहे. जय भीम,” असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. या पोस्टनंतर त्यांच्या समर्थकांमध्ये उत्सुकता वाढली असून प्रस्तावित आंदोलनाकडे देशभराचे लक्ष लागले आहे.
जंतर-मंतरवर आंदोलनाची तयारी
अभिजीत दिपके यांनी भारतात आल्यानंतर सर्वप्रथम दिल्लीतील पार्लियामेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यात भेट देणार असल्याचे सांगितले आहे. जंतर-मंतर येथे आंदोलनासाठी अधिकृत परवानगी घेण्याचा त्यांचा प्रयत्न राहणार आहे. सध्या दिल्ली पोलिसांकडून कोणतीही अधिकृत परवानगी मिळालेली नसल्याचे समोर आले आहे.
तथापि, त्यांनी पक्षाच्या समर्थकांना आणि नोंदणीकृत सदस्यांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
कॉकरोच जनता पार्टीच्या मते, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात हे आंदोलन करण्यात येणार आहे. NEET प्रश्नपत्रिका गळती प्रकरण आणि CBSE निकाल प्रक्रियेत कथित अनियमितता झाल्याचा आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे.
हजारो समर्थक जमण्याचा दावा
एका मुलाखतीत अभिजीत दिपके यांनी आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळेल असा दावा केला आहे. पक्षाचे 11 लाखांहून अधिक नोंदणीकृत सदस्य असल्याचे सांगत त्यांनी हजारो कार्यकर्ते आणि समर्थक दिल्लीत जमतील, असा विश्वास व्यक्त केला.
सोशल मीडियावरील मोहिमेतून पक्षाची सुरुवात
कॉकरोच जनता पार्टीची सुरुवात सोशल मीडियावरील एका उपरोधिक डिजिटल मोहिमेतून झाली होती. काही काळातच या मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळाला आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाखो फॉलोअर्स जोडले गेले. त्यानंतर ही ऑनलाइन चळवळ आता प्रत्यक्ष आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे.
राजकीय वर्तुळाचे लक्ष
अभिजीत दिपके यांचा दिल्ली दौरा आणि जंतर-मंतरवरील प्रस्तावित आंदोलनामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आंदोलनाला किती प्रतिसाद मिळतो, प्रशासनाची भूमिका काय राहते आणि पुढील घडामोडी कोणत्या दिशेने जातात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.