50 आमदार पक्षाच्या चिन्हावर दावा करण्याच्या तयारीत असल्याचा दावा; पश्चिम बंगालच्या राजकारणात खळबळ
कोलकाता : महाराष्ट्रात 2022 मध्ये घडलेल्या राजकीय घडामोडींप्रमाणेच पश्चिम बंगालमध्येही पक्षांतर्गत संघर्ष उफाळून आल्याची चर्चा सुरू झाली आहे. तृणमूल काँग्रेसच्या काही आमदारांच्या कथित गुप्त बैठका आणि वाढती नाराजी यामुळे पक्षात फुट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तृणमूल काँग्रेसच्या निलंबित राष्ट्रीय प्रवक्ते रिजू दत्ता यांनी केलेल्या दाव्यानुसार, पक्षातील सुमारे 50 आमदार मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाविरोधात भूमिका घेत असून पक्षाच्या निवडणूक चिन्हावर दावा करण्याची तयारी करत आहेत. या दाव्यामुळे पश्चिम बंगालच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
आंदोलनाला अनेक दिग्गज नेत्यांची दांडी
मंगळवारी कोलकात्यातील राणी रासमणी ऍव्हेन्यू येथे ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन आयोजित करण्यात आले होते. मात्र या आंदोलनाला पक्षातील अनेक वरिष्ठ नेते आणि आमदार अनुपस्थित राहिल्याने बंडखोरीच्या चर्चांना अधिक बळ मिळाले.
या आंदोलनात शोभनदेव चट्टोपाध्याय, नैना बंडोपाध्याय, मदन मित्रा, अशोक देब, असीमा पात्रा यांच्यासह खासदार डोला सेन आणि कल्याण बॅनर्जी उपस्थित होते. मात्र पक्षातील अनेक महत्त्वाचे नेते गैरहजर राहिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले.
विरोधी पक्षनेतेपदावरून वाद
पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेत्याच्या नियुक्तीवरून पक्षात मतभेद वाढल्याचे सांगितले जात आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी आमदार ऋतब्रत बॅनर्जी आणि संदीपान साहा यांची पक्षातून हकालपट्टी केली.
रिजू दत्ता यांच्या म्हणण्यानुसार, पक्षातील बहुतांश आमदारांची इच्छा ऋतब्रत बॅनर्जी यांना विरोधी पक्षनेतेपद देण्याची होती. मात्र पक्ष नेतृत्वाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने आमदारांमध्ये नाराजी वाढली आहे.
तृणमूल काँग्रेससमोर मोठे आव्हान
तृणमूल काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या घडामोडींमुळे पक्षाचे संघटनात्मक अस्तित्व आणि ममता बॅनर्जी यांचे नेतृत्व यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. बंडखोरीच्या चर्चांना अधिकृत दुजोरा मिळालेला नसला तरी पक्षातील अंतर्गत संघर्ष आता उघडपणे समोर येत असल्याचे चित्र आहे.
आगामी काळात या राजकीय घडामोडी कोणते वळण घेतात, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.