नागपूर : शासकीय वसतिगृहातील असुविधांविरोधात थेट मुख्यमंत्रीांकडे तक्रार करणाऱ्या विद्यार्थिनीला प्रशासनाने वसतिगृह सोडण्याची नोटीस बजावल्याचा धक्कादायक प्रकार नागपूरमध्ये समोर आला आहे. सावित्रीबाई फुले वसतिगृहात राहणारी आकांक्षा उके ही विद्यार्थिनी सध्या चर्चेत असून, या प्रकरणामुळे शासकीय यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
वसतिगृहातील सुविधांअभावी विद्यार्थिनींचे हाल
आकांक्षा उके ही गरीब शेतकरी कुटुंबातील विद्यार्थिनी असून ती नागपूरच्या शासकीय सावित्रीबाई फुले वसतिगृहात राहते. नागपूरमधील तीव्र उष्णतेच्या पार्श्वभूमीवर वसतिगृहात कुलर आणि इतर मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने विद्यार्थिनींना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.
याच समस्यांबाबत आकांक्षाने 4 आणि 8 तारखेला थेट मुख्यमंत्रीांकडे तक्रार केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फटकारल्याची माहिती समोर आली आहे.
‘ट्रेनिंग’चा मुद्दा पुढे करत नोटीस
मुख्यमंत्र्यांच्या नाराजीनंतर प्रशासनाने सूडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप केला जात आहे. आकांक्षा एका प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी असताना ती नोकरी करत असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आणि त्याच कारणावरून तिला वसतिगृह रिकामे करण्याची नोटीस देण्यात आली.
या नोटिसीनुसार तिला तातडीने वसतिगृह सोडावे लागणार होते. यामुळे विद्यार्थिनींमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सहा महिन्यांचा खर्च वसूल केल्याचा आरोप
आकांक्षाकडून गेल्या सहा महिन्यांचा निवास आणि भोजन खर्च सक्तीने वसूल करण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे विद्यार्थिनी आणि सामाजिक संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

पालकमंत्री बावनकुळे यांचा हस्तक्षेप
प्रकरणाची माहिती समोर आल्यानंतर नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तातडीने हस्तक्षेप केला. त्यांनी आकांक्षा उके हिच्याशी फोनवर संपर्क साधत तिला धीर दिला.
“तुला वसतिगृह सोडण्याची गरज नाही. सरकार तुझ्या पाठीशी आहे,” असे आश्वासन बावनकुळे यांनी दिल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामुळे प्रशासनातील कथित हुकूमशाही आणि सूडबुद्धीच्या कारभारावर जोरदार टीका होत असून, संबंधित अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.