केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलनाची घोषणा; विमानतळावरून थेट जंतर-मंतरकडे मोर्चा
नवी दिल्ली : सोशल मीडियावर चर्चेत आलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) चे संस्थापक अभिजित दिपके ६ जून रोजी अमेरिकेतून भारतात परतणार आहेत. भारतात परतल्यानंतर अटक होण्याची शक्यता असल्याची जाणीव असूनही आपण परतण्याचा निर्णय कायम ठेवला असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
एका वृत्तसंस्थेशी संवाद साधताना अभिजित दिपके म्हणाले की, “विमानतळावर उतरताच मला अटक होऊ शकते, याची मला पूर्ण कल्पना आहे. तरीही मी भारतात येणार आहे. माझ्या समर्थकांनी मला आता थेट विमानतळावरच भेटावे.”
शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
परीक्षांमधील कथित गैरव्यवहार, पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांवर होणाऱ्या परिणामांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी शांततापूर्ण आणि संविधानिक आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे दिपके यांनी स्पष्ट केले.
त्यांच्या मते, हा लढा कोणत्याही एका परीक्षेपुरता मर्यादित नसून देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित आहे.
विमानतळावरून थेट आंदोलनस्थळी
भारतात परतल्यानंतर अभिजित दिपके विमानतळावरून थेट पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशनकडे जाणार आहेत. तेथे जंतर-मंतर येथे आंदोलन करण्यासाठी अधिकृत परवानगी मागितली जाणार आहे.
“हे आंदोलन पूर्णपणे अहिंसक आणि संविधानिक चौकटीत राहून केले जाईल. भारतीय संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांचा वापर करण्यासाठी मी भारतात परत येत आहे,” असे दिपके यांनी सांगितले.
‘१ कोटी विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात’
NEET पेपरफुटी प्रकरण, CUET, CBSE तसेच विविध भरती परीक्षांमधील कथित अनियमिततेचा उल्लेख करत दिपके यांनी दावा केला की, या घटनांमुळे एक कोटीहून अधिक विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे.
“सरकारला जबाबदारीची जाणीव करून देणे ही आमची दीर्घकालीन भूमिका आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व निश्चित व्हावे, यासाठी हे आंदोलन आहे,” असे ते म्हणाले.
धमक्यांनंतरही आंदोलनाचा निर्धार
गेल्या काही दिवसांत विविध प्रकारच्या धमक्या मिळाल्याचा दावा करताना दिपके म्हणाले की, त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांमुळे किंवा टीकेमुळे ते विचलित झालेले नाहीत.
“मी फक्त सरकारला प्रश्न विचारले आहेत. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आवाज उठवणे हा गुन्हा नाही,” असे सांगत त्यांनी आंदोलनाचा निर्धार कायम असल्याचे स्पष्ट केले.
राजकीय आणि सामाजिक वर्तुळाचे लक्ष
अभिजित दिपके यांच्या भारतात पुनरागमनानंतर होणाऱ्या घडामोडी, संभाव्य आंदोलन आणि प्रशासनाची भूमिका याकडे आता देशभरातील विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.