मुंबई | प्रतिनिधी
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या चर्चित ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या बनावट प्रती बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असल्याचा गंभीर आरोप पानसरे कुटुंबीयांनी केला आहे. या आरोपामुळे साहित्य, इतिहास आणि राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटले आहे.
पानसरे कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, मूळ पुस्तकातील मजकुरात छेडछाड करून काही प्रकाशकांनी अनधिकृतपणे पुस्तकाच्या प्रती छापल्या आणि त्यांची विक्री सुरू केली. या प्रकरणी पुस्तकाचे अधिकृत प्रकाशक प्रशांत आंबी यांनीही गंभीर आक्षेप नोंदवले आहेत.
त्यांच्या मते, बाजारात उपलब्ध असलेल्या काही प्रतींमध्ये गोविंद पानसरे यांनी कधीही न लिहिलेले उतारे समाविष्ट करण्यात आले आहेत. तसेच, मूळ पुस्तकातील ज्येष्ठ न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची प्रस्तावनाही वगळण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणात अधिक माहिती घेण्यासाठी माध्यम प्रतिनिधींनी मधुश्री पब्लिकेशनचे प्रकाशक शरद अष्टेकर यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी अष्टेकर यांनी “नजरचुकीमुळे जुन्या प्रतींची छपाई झाली” असा दावा केला. तसेच, छापण्यात आलेल्या सुमारे पाच हजार प्रती नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
मात्र, या स्पष्टीकरणानंतरही अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले आहेत. पुस्तकाचे कॉपीराईट नसताना संबंधित प्रकाशन संस्थेने हे पुस्तक कसे छापले? इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या प्रतीच्या आधारे प्रकाशन करण्याचा निर्णय का घेतला? तसेच, पुस्तक छापण्यापूर्वी पानसरे कुटुंबीयांची किंवा अधिकृत प्रकाशकांची परवानगी का घेण्यात आली नाही? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
विशेष म्हणजे, ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून महाराष्ट्रात यापूर्वीही अनेकदा राजकीय वाद निर्माण झाले आहेत. अशा परिस्थितीत पुस्तकाच्या मजकुरात फेरफार झाल्याचा आरोप अधिक गंभीर मानला जात आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून बाजारात आणखी कोणत्या प्रकाशन संस्थांकडून अशा बनावट प्रतींची विक्री होत आहे का, याचा शोध घेण्याची मागणी होत आहे. इतिहासाशी संबंधित साहित्यामध्ये छेडछाड झाल्याचा आरोप असल्याने या संपूर्ण प्रकरणाकडे राज्यभरातील वाचक आणि अभ्यासकांचे लक्ष लागले आहे.
इतिहासाशी संबंधित साहित्याची विश्वासार्हता कायम राखणे ही प्रकाशकांची जबाबदारी असल्याचे मत व्यक्त केले जात असून, या प्रकरणातील सत्य समोर येणे आवश्यक असल्याची भावना विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.