नवी दिल्ली | प्रतिनिधी
देशातील यंदाचा नैऋत्य मान्सून अपेक्षेपेक्षा कमकुवत राहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (IMD) व्यक्त केली आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत देशभरात दीर्घकालीन सरासरीच्या केवळ 90 टक्के पर्जन्यमानाची नोंद होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे शेती, पिण्याचे पाणी आणि महागाईच्या आघाडीवर चिंता वाढली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जून महिन्यातही पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. जूनमधील पर्जन्यमान दीर्घकालीन सरासरीच्या सुमारे 92 टक्क्यांपर्यंत मर्यादित राहू शकते.
केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा
नैऋत्य मान्सून पुढील सात दिवसांत केरळ किनारपट्टीवर दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. साधारणपणे 1 जूनच्या आसपास मान्सून केरळमध्ये पोहोचतो आणि त्यानंतर देशातील मान्सून हंगामाची अधिकृत सुरुवात मानली जाते.
अल निनोचा वाढता धोका
हवामान तज्ज्ञांच्या मते, जून महिन्यात अल निनोची स्थिती तुलनेने कमकुवत राहू शकते. मात्र सप्टेंबरपर्यंत त्याची तीव्रता मध्यम ते अधिक वाढण्याची शक्यता आहे. अल निनो सक्रिय झाल्यास भारतीय मान्सूनवर विपरीत परिणाम होतो आणि पर्जन्यमानात घट होण्याचा धोका वाढतो.
शेतकरी आणि महागाईवर परिणाम होण्याची भीती
मान्सून कमकुवत राहिल्यास खरीप हंगामातील पेरण्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. पावसाअभावी उत्पादन घटल्यास अन्नधान्य आणि भाजीपाल्यांच्या किमती वाढू शकतात. आधीच जागतिक घडामोडींमुळे इंधन आणि इतर वस्तूंच्या किमतींवर दबाव असून, कमी पावसामुळे महागाईचा ताण आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्रातही समाधानकारक पावसाची शक्यता कमी
ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांच्या मते, महाराष्ट्रासह देशाच्या बहुतांश भागांमध्ये यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. जून महिन्यात राज्यातील अनेक भागांमध्ये कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त राहू शकते.
उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, बिहार, ओडिशा, छत्तीसगड, गुजरात, आंध्र प्रदेश तसेच महाराष्ट्रातील काही भागांमध्ये उष्णतेच्या लाटेचा प्रभाव अधिक जाणवण्याचा अंदाज आहे.
मान्सून पट्ट्यातही कमी पावसाचा अंदाज
देशातील शेतीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असलेल्या मान्सून मुख्य पट्ट्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान होण्याची शक्यता आहे. यामुळे खरीप हंगामातील उत्पादनावर परिणाम होऊ शकतो.
हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, देशातील प्रमुख मान्सून पट्ट्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज असून त्याचा परिणाम शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो.